This post is also available in: English Hindi
एका मोठ्या नदीच्या पलिकडे एक गाव होतं. गावाबाहेर कुठेही जायचं असेल तर गावकरी स्वतःची नाव वापरत. शिवाय ती गावातल्याच बांबुंपासून तयार करत असत. सर्व गावकरी मंडळी सकाळी उठून आपापली नाव घेऊन लगबगीनं कामाला जात आणि संध्याकाळी घरी परतत.
एकदा गावात एक पाहुणा आला, तो इंजिनियर होता. गावकर्यांना नदी ओलांडण्यासाठी कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं याचं त्याने प्रथम निरीक्षण केलं. तेव्हा ज्यांची नाव जुनी आहे त्यांना ती तुटण्याची भीती कशी वाटते, वृद्ध लोक जास्त वेळ नाव का वल्हवू शकत नाहीत, मध्येच थकून कसे जातात, अशक्त, आजारी लोक आवश्यक कामासाठी सुद्धा नदीच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. तसेच गावकर्यांकडे एखादी मोठी नाव किंवा एखादा स्ट्रिमर (नाव तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा झेंडा) खरेदी करु शकतील एवढी ही संपत्ती नव्हती, हे त्याच्या लक्षात आलं.
त्यानंतर त्या व्यक्तीने आपले अभियांत्रिकीचे सर्व कौशल्य पणाला लावून एक लहानसे इंजिन तयार केले आणि त्याला नाव जोडली. त्या नावेच्या मागे अनेक नावा बांधता येतील अशी व्यवस्था त्याने केली. इंजिन जोडलेली नाव पुढे आणि तिच्यामागे इतर नावा चालत असत. आताही लोकांना वल्हं वापरावं लागत असलं तरी त्यासाठी लागणारी शक्ती मात्र खर्च करावी लागत नव्हती. नाव चालवू न शकणार्या नाविकांच्याही दोन चार नावा किनार्यावर पोहोचत. अशाप्रकारे या इंजिनाच्या मदतीने सर्वांनाच, विशेषतः असमर्थ लोकांना नदी पार करणं सहजसुलभ होत होतं.
या उदाहरणात काही संदेश दडलेले आहेत.यातील लहान लहान नावा म्हणजे तुमच्या जीवनातील लहान लहान ध्येय, जी वेळोवेळी डळमळित होत राहतात. तुम्ही त्यांच्यापुढे कधी धैर्यानं उभे राहतात तर कधी डगमगता. यांपैकी जी ध्येयं दमदार आणि तुमच्या आवडीची असतात ती तुम्ही सहजतया पूर्ण करू शकतात. मात्र जी तुमच्या स्वभावाशी सुसंगत नसतात त्यांना काहीतरी बहाणे सांगून अर्धवट सोडता.
या ध्येयांना तुमच्या जीवनाचं मोठं दृष्टिलक्ष्य जोडलं तर ऊर्जेसह तुमचा उत्साहसुद्धा दुप्पट होतो किंबहुना तुमच्या सर्व ध्येयांना बळ प्राप्त होऊन ते पूर्ण होतात. होय! दृष्टिलक्ष्य (लक्ष्यामागील लक्ष्य)हेच तुमच्या जीवनाचं असं इंजिन आहे, जे तुमच्या गाडीला कोणत्याही पद्धतीनं ध्येयापर्यंत पोहोचवतं. हे पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊ या.
अनेक लोकांना त्यांचे वाढते वजन आणि आवश्यकतेपेक्षा जास्त खाण्याने स्वास्थ्याच्या समस्या निर्माण होतात. अनेकदा प्रयत्न करूनही ते खाण्यावर ताबा मिळवू शकत नाहीत… अशा लोकांना सहाय्य म्हणून सर्व धर्मांमध्ये अनेक व्रतवैकल्ये, रोजे, नवरात्रीचे उपवास इत्यादींचं पालन करायला सांगितलं जातं. त्यात वेळोवेळी उपवास करण्यासाठी ईश्वराच्या भक्तीचं दमदार दृष्टिलक्ष्य दिलं जातं. दृष्टिलक्ष्य बळकट करण्यासाठी त्यामागे अनेक कथा जोडल्या गेल्या आहेत, उदा. अमुक एका व्रतामुळे महान फळ मिळते… सारी दुःख नष्ट होतात… वैभव प्राप्त होतं… हे व्रत जे करणार नाहीत त्यांचे नुकसान होते… त्यांच्या जीवनात समस्या निर्माण होतात… वगैरे. त्यामुळे काही लोक परमेश्वराच्या भीतीने, काही इच्छापूर्तीसाठी तर काही भक्तिभावाने व्रत- उपवास करतात. अर्थातच त्यांना जास्त खाण्यावर ताबा मिळून पचनसंस्था सुधारण्याच्यादृष्टीने सामान्य ध्येयाला भक्तीचे दमदार दृष्टिलक्ष्य मिळते. आधी ते प्रयत्न करुनही खाण्यावर ताबा मिळवू शकत नव्हते; परंतु परमेश्वराचा विषय येताच मोठ्यात मोठ्या व्रताचंही पालन होऊन ते पुनःपुन्हा अंगिकारलं जातं.
हाच आहे दमदार दृष्टिलक्ष्याचा प्रभाव! तो तुमची ऊर्जा आणि उत्साह वाढवून गगन भरारी घेतो. दुर्बल इच्छाशक्तीला बळ देतो, ध्येय प्रभावी करतो, तुम्हाला दूरदृष्टी देतो त्यामुळेच तुमचं एक नव्हे तर सर्व ध्येयं सफल होतात.
दृष्टिलक्ष्य जास्तीत जास्त प्रभावी आणि यशस्वी करण्याची युक्ती म्हणजे त्याला अवैयक्तिक (निःस्वार्थ) गोष्टीची जोड देणे होय. अवैयक्तिक दृष्टिलक्ष्य केवळ तुमचे कल्याण न करता लोककल्याण सुद्धा करते. त्यामुळे तुम्हीच नव्हे तर अन्य अनेक लोकही लाभ प्राप्त करतात. असं करणं फारसं कठीण नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचं दृष्टिलक्ष्यदेखील बदलण्याची आवश्यकता नाही. केवळ त्यामागची भावना बदलून ते निःस्वार्थ करण्याची गरज असते.
एका मुलाला ‘शेफ’ व्हायचं असतं. कारण त्याला खाद्यपदार्थ तयार करण्याची आवड असते. देशाचा सेलिब्रिटी बनून खूप प्रसिद्धी व पैसा मिळवणं हे त्याचं वैयक्तिक ध्येय बनतं. आता हे वैयक्तिक लक्ष्यसुद्धा अव्यक्तिगत करता येऊ शकतं. त्यानं जर ठरवलं, की ‘मी तयार केलेलं अन्न खाऊन लोकांची चेतना वाढावी, त्यांना आनंद- संतुष्टी मिळावी, या क्षेत्रात पुढे येणार्या युवकांसाठी नवा मार्ग निर्माण करावा, त्यांना मार्गदर्शन करावं’ तेव्हा ते अव्यक्तिगत दृष्टिलक्ष्य ठरतं. कारण यात केवळ त्यालाच नव्हे तर अनेक लोकांना त्याचा फायदा होतो. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक लक्ष्यामागे मोठे अव्यक्तिगत दृष्टिलक्ष्य जोडू शकता.
आपल्या कार्याला अव्यक्तिगत दृष्टिलक्ष्य दिल्यामुळे फक्त आपलाच नव्हे तर देशाचा आणि समाजाचाही फायदा कसा होतो ते एका कंपनीच्या उदाहरणावरून बघू या.
एक ऑटोमोबाईल कंपनी आहे.त्या कंपनीचा सी.ई.ओ. आपल्या कंपनीची कार देशातली उत्कृष्ट कार ठरावी हे दृष्टिलक्ष्य बाळगतो. त्या कंपनीत वेगवेगळे विभाग आहेत. जसे, डिझायनिंग, प्रोडक्शन, टेस्टिंग, मार्केटिंग, अडव्हरटाइजमेंट, अकाऊंट इत्यादी. प्रत्येक विभागाने जर त्यांचं ध्येय ठरवलं तर त्यांचा फोकस फक्त उत्कृष्ट काम करण्यावरच राहील. डिझायनर म्हणतात, ‘आम्ही कारचे असे डिझाईन तयार करू जे याआधी कधीही झाले नसेल. संपूर्ण विश्वात त्याची चर्चा व्हावी.’ प्रॉडक्शन विभागही उत्कृष्ट पद्धतीने योगदान देऊन इम्पोर्टेड पार्ट्स उपयोगात आणून मुदतीआधी उत्कृष्ट कार तयार करतात. ती कार पुढे टेस्टिंग विभागात जाते आणि फायनल प्रॉडक्ट बाजारात लॉन्च होते. मग त्याच्या सुंदर जाहिराती येतात. काही दिवस ही कार बाजारात चर्चेचा विषय ठरते आणि मग आधीपासूनच बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक कारप्रमाणे तीदेखील एक ठरते.
आता या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये एक नवा सी.ई.ओ. येतो. त्याचा ही अव्यक्तिगत दृष्टिलक्ष्यावर अधिक विश्वास असतो. कंपनीतील संपूर्ण स्टाफला तो एकत्र बोलोवून सांगतो, ‘आपली यापुढची कार अशी असावी’, जी संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असेल. त्यामुळे आपला देश ऑटोमोबाईल क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करेल. शिवाय स्वदेशी तंत्रज्ञान वापरल्याने कारची किंमत ही कमी असेल, ज्यामुळे जास्तीत जास्त लोक ती खरेदी करु शकतील, तिचा फायदा घेतील. शिवाय आपण जगाला हेही दाखवून देऊ, की कमी खर्चात उत्कृष्ट कार कशी तयार करता येऊ शकते! पुढे जाऊन सारं जग या मॉडेलचं अनुकरण करेल .त्यामुळे आपल्या देशाचां नाव उज्ज्वल होईल. याप्रकारे आपली कार फक्त आपल्या देशातच नव्हे तर विदेशातसुद्धा रोल मॉडेल ठरेल. आता आपण सर्व स्वतःला कर्मचारी न समजता देशाचे रक्षक समजू या, आपल्या कामाला लागून देशाला ही काररूपी भेट देऊ या.
नव्या सी.ई.ओ.च्या भाषणाचा सर्व कर्मचार्यांवर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडतो. सर्वजण संपूर्ण ऊर्जा आणि उत्साहासह आपापल्या कामाला लागतात. डिझायनर विचार करू लागले, ‘कारचे डिझाईन कसे असावे? ते आकर्षक कसे दिसावे, ज्यातून त्याद्वारे भारतीयता झळकावी. त्याचप्रमाणे ती तयार करण्यासाठी स्वदेशी पार्ट्स वापरले जावेत.’
प्रॉडक्शन विभागानेही अव्यक्तिगत दृष्टिलक्ष्य विचारात घेऊन सर्वसमावेशकदृष्टीने कारची निर्मिती केली. तिचे सुटे भाग देशातच तयार केले गेले. त्यामुळे देशातील तंत्रज्ञान विकसित झाले आणि खूप लोकांना रोजगार मिळाला. प्रत्येक विभागाने हे अव्यक्तिगत दृष्टिलक्ष्य पूर्ण करण्यासाठी कौशल्यपूर्वक सहकार्य केले. केवळ स्वतःला उत्कृष्ट समजण्यापेक्षा दुसर्या विभागाला सहकार्य केलं आणि समन्वयाकडेही लक्ष दिलं. परिणामी ही कार केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी आदर्श ठरली आणि अनेक लोकांची अशी कार घेण्याची इच्छा पूर्ण झाली.
या उदाहरणाद्वारे आपल्याला हा संदेश मिळतो, की कोणत्याही व्यवहाराच्या यशात तुमच्याजवळ एक महान अव्यक्तिगत असे दृष्टिलक्ष्य असायला हवे. त्यामुळे त्या व्यवहारातील लहान-मोठ्या कर्मचार्यांच्या मनातसुद्धा समूहाशी संलग्न असल्याची भावना निर्माण व्हावी. दृष्टिकोन भलेही वेगळे ठेवा परंतु दृष्टिलक्ष्यच्या यशात त्याला स्वतःचं यश दिसावं. आपण स्वतः त्याचा एक भाग आहोत म्हणून सन्मान आणि गौरव वाटावा. शिवाय ते पूर्ण झाल्याने त्याला स्वतःच काहीतरी प्राप्त केल्यासारखं वाटावं.
ज्या कंपन्या असं अव्यक्तिगत दृष्टिलक्ष्य ठेवतात यांना यशापासून कोणीही रोखू शकत नाही. मग हे लोक त्यांचं जीवन अशा महान अव्यक्तिगत दृष्टिलक्ष्यसाठी समर्पित करतात, जे यशस्वी आणि महान झाल्याशिवाय राहत नाहीत.
Leave a reply